नमस्कार मित्रांनो, जय शिवराय

ऐतिहासिक विषयांचा धांडोळा घेताना कुठंतरी जाणवलं की ज्या शस्त्रांमुळे आपला ज्वलंत देदीप्यमान असा इतिहास घडलाय ती शस्त्रच आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, त्यामुळे आजचा विषय अश्याच एका शस्त्रावर ज्याला इतिहासात मानाचं पान आहे, ते शस्त्र म्हणजे कट्यार.

आपल्यापैकी अनेक जणांना आठवत असतील पूर्वीची लग्न. लग्न साधीच असायची पण त्यामध्ये जे विधी व्हायचे ते पूर्णपणे शास्त्रोक्त पद्धतीने आणि आपल्या कुळाला, कुलदैवतेला स्मरून व्हायचे. लग्नसोहळा देखील पाच- पाच दिवस चालायचा. आप्तेष्ट नातेवाईक यांच्या भेटी, लग्नघराची चाललेली धांदल, एकूणच गोड वातावरण तयार व्हायचं.

विवाहप्रसंगी नवरदेवाने कट्यार बाळगायची असते असं शास्त्र आहे आणि त्याचबरोबर वधूवरांच्या मागे उभे असलेले त्यांचे मामा यांच्या हातात तलवारी असायच्या.
तलवारीवर आपण स्वतंत्र लेख लिहुया, तूर्तास कट्यारीचा इतिहास बघू,
तर कट्यारीचा इतिहास तसा खूप प्राचीन पण त्याचा पुरेपूर आणि योग्य उपयोग मराठ्यांनी केला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कट्यारीला मोठे महत्व प्राप्त झाले होते.तलवार तर प्रत्येकाकडे असायची पण कट्यार बाळगणारी व्यक्ती साधी सुधी असामी नसायची, खासे सरदार आणि दरबारच्या मानी सरदारांनाच कट्यारीचा मान होता.

कट्यार ( फोटो साभार रुद्रा आर्टस् )

कट्यार हे एक छोटे शस्त्र असून ते सोबत बाळगायला सोपे जायचे आणि ऐनवेळी तलवार जर नसली तर कट्यारीच्या साहाय्याने आपण लढू शकतो.

हे झाले कट्यारीचे महत्व, 

पण मग विवाहप्रसंगी नवरदेवाने कट्यार सोबत का बाळगायची असते ?

 प्रत्येक मावळ्याचं पहिलं लग्न हे तलवार म्हणजेच शस्त्रासोबत होत असतं. कट्यार असो किंवा तलवार ही मराठयांची अर्धांगिनी होती. त्यामुळे तिला कंबरेवर बसायचा मान होता, पण मी आधीच सांगितल्याप्रमाणे कट्यार हे शस्त्र खूपच मानाचे समजल्या जात असे.
नवरदेव हा त्या दिवसाचा मान असणारा पुरुष होता, त्या दिवशी म्हणजेच लग्नाच्या दिवशी तरी त्याला देव मानायचे (नवरदेव) म्हणून नवरदेवाला कट्यारीचा मान दिल्या जायचा. ही कट्यार नवरदेवाने हातात घ्यायची असते किंवा मग दुशेल्यात खोवल्या जायची. 
आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचं मूळ चित्र जर बघितलं तर त्यामध्येही कट्यार दाखवली आहे म्हणजेच महाराज कट्यार कायम सोबत बाळगायचे.
महाराजांचे जे विश्वसनीय व्यक्ती किंवा सरदार होते ज्यांना दरबाराच्या पहिल्या पातीचा मान असे अशा व्यक्तींनाच कट्यार बाळगायचा मान होता.

तलवारीचं जर आपण विवाहप्रसंगी महत्व बघितलं तर आपल्या लक्षात येईल की तलवारी वापरणं हे तेव्हा सामान्य होतं म्हणजेच मराठे तर कायम तलवार सोबत बाळगायचे. वर आणि आप्तेष्ट हे शस्त्र नेहमी बाळगत याला शास्त्र (तर्क) देखील आहे, पूर्वीच्या काळी जेव्हा यवनी पातशाह्या असतील किंवा दरोडेखोर, लुटारू यांच्यापासून जनतेला धास्ती असायची.
किंवा एखादे परकीय आक्रमण असेल त्यावेळी प्रचंड गदारोळ व्हायचा. स्त्रिया मुली यांना डोळ्यादेखत पळवून न्यायचे अशावेळी सर्व पुरुषांकडे शस्त्र असायची. 
अजून एक म्हणजे लग्नप्रसंगी मानाच्या तलवारी सुद्धा मिरवणूकिला बाहेर निघायच्या ज्या त्या त्या गावातील देवकार्यासाठी दिलेल्या असायच्या.

तर अशी ही कट्यार ! मराठयांचं आवडीचं एक शस्त्र. ज्या शस्त्रांनी इतिहास घडवला तीच शस्त्रं आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. याला कारण म्हणजे जेव्हा इंग्रजांचं राज्य भारतात सुरू झालं त्यावेळी त्यांनी आपली शस्त्रं नष्ट करण्याचा प्रयत्न केला, मग धोप तलवारी असतील, पट्टा, किंवा कट्यार ही शस्त्र नष्ट करण्याचा प्रयत्न केला ; का ? कारण त्यांना भीती होती की मराठ्यांच्या हातात शस्त्रं असली तर यांना पुन्हा एकदा इतिहास घडवायला वेळ नाही लागणार.

आजकाल काही लग्नांमध्ये वराने कट्यार बाळगणं दुर्मिळ होत चाललंय. एकतर कुणाकडे कट्यार नसते, ती भाड्याने किंवा इतरांकडून आणावी लागते (खरंच खंत वाटते, की आपल्या पूर्वजांनी ज्या शस्त्रांनी इतिहास घडवला, ती शस्त्रं बघायला मिळणंही दुर्मिळ होतंय) ज्या शस्त्रांनी आपला इतिहास घडवला, ज्यांच्यामुळे आज आपलं अस्तित्व टिकून आहे त्या शस्त्राला नेहमी वंदन 🙏

टीप : लेखामध्ये मराठा हा शब्द फक्त जातीवाचक घेऊ नये.

लेखन :  रोहित पेरे पाटील
 © इतिहासवेड

8 टिप्पण्या

  1. उत्तम लेख. मराठा हा जातीवाचक शब्द नाही, महाराष्ट्रातील सर्व जातीचे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते त्यांना मराठा सैन्य म्हणत, त्यामुळे मराठा हा जातीवाचक शब्द होत नाही.

    उत्तर द्याहटवा
  2. उत्तम लेख. मराठा हा जातीवाचक शब्द नाही, महाराष्ट्रातील सर्व जातीचे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते त्यांना मराठा सैन्य म्हणत, त्यामुळे मराठा हा जातीवाचक शब्द होत नाही.

    उत्तर द्याहटवा
  3. उत्तम लेख. मराठा हा जातीवाचक शब्द नाही, महाराष्ट्रातील सर्व जातीचे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते त्यांना मराठा सैन्य म्हणत, त्यामुळे मराठा हा जातीवाचक शब्द होत नाही.

    उत्तर द्याहटवा
  4. अतिशय उत्तम माहिती दिली आहे, मराठा हा शब्द जातीवाचक घेऊ नये असे बरेच जणांनी म्हटले आहे, त्यात सुधारणा करतो, महाराष्ट्र प्रांतात असलेल्या सर्व क्षत्रिय जाती त्यात मराठा, भावसार क्षत्रिय, सोमवंशी क्षत्रिय, अहिर क्षत्रिय सोनार, क्षत्रिय कासार, धनगर क्षत्रिय पोटजात व इतर क्षत्रिय जाती पोटजाती या विवाह प्रसंगी नवरदेवाजवळ कट्यार बाळगली जाते. हाच नियम भारतात असलेल्या मुख्य क्षत्रिय जाती राजपूत, गोरखा, शीख , दक्षिणेकडे नायर या जाती कट्यार , तलवार आदी शस्त्र विवाह प्रसंगी बाळगतात.

    उत्तर द्याहटवा
  5. दादासाहेब💝🙏 खुप छान माहिती दिली ❤🥰🚩

    उत्तर द्याहटवा
  6. आमच्या कडे जुनी कट्यार आहे. जाड पात्याची अंदाजे पात १ फुट भर आणि पकडायला अर्धा फुट मुठ आहे

    उत्तर द्याहटवा